
जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२६
चोपडा तालुक्यातील श्री क्षेत्र धानोरा, सतपंथ नगर येथे दि.६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या चतुर्विध महोत्सवाची आज महामंडलेश्वरांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवाच्या प्रारंभी विधीवत ध्वजारोहण करून देवदेवतांना आवाहन करण्यात आले होते.
सतरा दिवस सुरू असलेला हा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने व निर्विघ्नपणे पार पडल्याने आज मंगळवारी सकाळी १० वाजता सांगता सोहळा पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे परमपूज्य मुक्ताई रत्न महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन व मंत्रोपचार करून ध्वज उतरविण्यात आला.
या वेळी ध्वजाची विद्युत पूजा व मंत्रोपचार ब्राह्मण देवता पं.राहुल पाठक यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडली. याप्रसंगी संत विजय प्रकाशजी महाराज यांच्यासह सर्व मुखी, मानकरी व हजारो भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचन देताना सांगितले की, “चतुर्विध महोत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून तो आत्मशुद्धीचा व समाज एकतेचा सोहळा आहे. धानोरा येथील भाविकांनी दाखविलेली श्रद्धा व शिस्त कौतुकास्पद आहे.”ध्वज उतरविण्याच्या सोहळ्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. महोत्सव काळात अखंड हरिनाम जप, भजन,सतसंगं, प्रवचन व अन्नदान असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.





















