जळगाव मिरर | ५ जुलै २०२५
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी व हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी साजरा करण्यासाठी आज एकत्र आले. मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या या मनोमिलनाद्वारे मराठी भाषा व संस्कृतीच्या हितासाठी एकजुटीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे मानले जात आहे. मेळाव्याच्या यशानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता उपरोक्त घोषणा दिली.
“सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं!” अशी घोषणा करत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीन आयोजित मराठी विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी दोन्ही बंधू 100 एकत्र येणार, असा विश्वासही व्यक्त केला. शिवाय एकनाथ शिंदे आणि नारायण यांना मोदी – शहांनी हवा भरलेले फुगे म्हणत जोरदार टोले लगावले.
नेमके काय म्हणाले संजय राऊत?
आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही जन्मत:च ठाकऱ्यांसोबत आहोत. कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला, असे संजय राऊत म्हणाले. सुदैवाने दोन्ही ठाकऱ्यांशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचे चित्र उभे राहिले, असेही त्यांनी म्हटले. राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकले. राजकारणात संवाद पाहिजे. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला. तो संवाद कायम राहिला पाहिजे.
आजच्या मेळाव्याच्या यशासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिकपणे श्रेय दिले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, होय, खरंय. मीही त्यांना श्रेय देतो. त्याच चिडीतून आणि जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला, असे ते म्हणाले. आपण एकत्र आले पाहिजे, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या शत्रूंना धडा शिकवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
मला 100 टक्के खात्री
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करत राऊत म्हणाले, मला 100 टक्के खात्री आहे. तसे नसते तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहे. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो.
सिंहासन खाली करो, ठाकरे आए है
संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत बसलेल्या महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे? कोण राणे? हे मोदी-शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील, असा घणाघात राऊत यांनी केला.
