
जळगाव मिरर | १५ जून २०२५
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड येथे शेतकरी शांताराम शंकर कठोरे (वय ४४) हे शेतात काम करत असताना वीज पडून जागीच ठार झाले. ही घटना आज १४ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शांताराम कठोरे हे शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. त्यानंतर आज सायंकाळी अचानक जोरदार वाऱ्याची झुळूक सुरू झाली. काही क्षणांतच विजांचा कडकडाट होताच, वीज शेतात शांताराम कठोरे यांच्या अंगावर कोसळली. काही वेळातच शेजारील शेतकऱ्यांनी ही घटना पाहून आरडाओरड केली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण पुनाड गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने कठोरे यांची पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान योजने अंतर्गत कठोरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




















