अमळनेर : विक्की उत्तम जाधव
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी गझल कट्टा रंगला. गझलकारांनी एकसे बढकर एक गझल सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. सभामंडप-3 बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे सभागृहात हा गझलकट्टा पार पडला. प्रतिमा सराफ, मुंबई, वृषाली अभिजित देशपांडे, नागपूर यांनी या गझल कट्ट्याचे संयोजन केले. डॉ.अविनाश सांगोलकर (सोलापूर) अध्यक्षस्थानी होते. मनोहर नेकर यांनी सूत्रसंचालन केले.
चोपडा येथील राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गझलकार प्रा.योगिता पाटील बोरसे यांच्या “सामान्य माणसांचा जयकार होत नाही,
सामान्य माणसांचा उद्धार होत नाही विश्वास ठेवला की विश्वासघात होतो परका कुणी कधीही गद्दार होत नाही” या गझलेने रसिकांची सर्वाधिक पसंती मिळविली. मनोज वराडे यांची ‘कावळे जमलेत खुर्चीला शिवाया, नेमका वारस तिच्या नजरेत नाही’ ही गझलही रसिकांना भावली. डॉ.अविनाश सांगोलकर यांची ‘बनली जरी ही दुनिया जनावरांची, अविनाश तू तरीही अपवाद एक आहे’ ही गझल सभागृहात वेगळे वातावरण निर्माण करून गेली. यासोबतच बबन धुमाळ (पुणे), सुनीता कपाळे (छत्रपती संभाजीनगर),चंद्रशेखर भुयार यांच्यासह इतरही गझलकारांनीही आपापल्या गझल सादर करून गझलकट्ट्यास उपस्थित रसिक, प्रेक्षकांची वाहवा मिळविली. गझलकार आपल्या गझल सादर करीत असताना श्रोते कधी टाळ्यांनी दाद होते, तर कधी हात उंचावून कौतुक करीत होते.