
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२६
दक्षिणेकडील खान्देशाचे प्रवेशव्दार असणा-या चाळीसगावात मंगळवारी कन्नड घाटाच्या पायथ्याशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गगनभेदी गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि चौंडी येथून प्रारंभ झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे दूपारी जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले असून तिचा खान्देशात प्रवेश झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी यात्रेचे स्वागत केले.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खा. रामराव वडकूते, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह हजारो जलयात्री यांची प्रमुख उपस्थिती होती. बंजारा समाजबांधवांनी देखील यावेळी यात्रेचे स्वागत केले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण,उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी,बाबा महाराज मोरे, अर्जुन जगताप,रोहिणी नायडू, दिपक सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील, नगरसेवक, उपसभापती शैलेंद्रसिंह पाटील, धनगर समाज संघटना आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात ठिकठिकाणी स्वागत
भव्य रथ त्यावर जलसंवर्धनाचा संदेश देणारा देखावा असे या जलयात्रेचे प्रबोधनात्मक रुप असून नागद रोड चौफुली येथेही यात्रेचे उत्साहात स्वागत केले गेले. पाटणादेवी रोडस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला जलसंपदा मंत्री विखे – पाटील याआच्यासह आमदार श्री चव्हाण व उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर हॉटेल दयानंद, घाट रोड मार्गे आलेल्या जलयात्रेचे व रथाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकतील मैदानातही उत्सूर्फत स्वागत करण्यात आले. नागरिक, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. जलयात्रेव्दारा जलसंवर्धन, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि समाजातील जनजागृती यांना चालना देण्याचा ठाम संदेशही देण्यात आला.
३०० व्या जयंतीनिमित्त जागर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जलसंपदा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण जलसंवर्धन चळवळ आहे. नद्यांचे अस्तित्व टिकवणे, जल व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देणे याव्दारे देण्यात येत आहे. २५ ते २९ एप्रिल दरम्यान ही यात्रा काढण्यात येत असून २६ एप्रिल रोजी शिर्डी येथे दोन्ही यात्रांचा संगम झाला. यात्रेत ३० नद्यांच्या कलशातून जल आणून जलसंवर्धनाचा संदेश दिला जात आहे. ५०० हून अधिक जलयात्री, वारकरी, युवक आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहे. यात्रेदरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखवली जात आहे.





















