
जळगाव मिरर | २५ जून २०२६

“मंत्रालयातील सचिव माझ्या ओळखीचे असून तुमच्या मुलाला कृषी विभागात गट ‘क’ संवर्गातील सरकारी नोकरी लावून देतो,” असे आमिष दाखवत एका निवृत्त कर्मचाऱ्याकडून तब्बल साडेतीन लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारत एकनाथ गायकवाड आणि त्यांचा मुलगा साहील भारत गायकवाड (दोघे रा. घाटनांद्रा, ता. बुलढाणा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर फिर्यादी नामदेव देवराम मोरे (वय ६६, रा. गोविंदपुरा, संभाजीनगर) असून, ही घटना ऑक्टोबर २०२२ ते जून २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून अस्थापना पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झालेले नामदेव मोरे यांची एका सामाजिक कार्यक्रमात भारत गायकवाड यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये गायकवाड यांनी मोरे यांना फोन करून मंत्रालयातील सचिवांशी आपली ओळख असल्याचे सांगत त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सुरुवातीला मोरे यांनी नकार दिला होता. मात्र, “नोकरी लागली नाही तर संपूर्ण रक्कम परत करीन,” अशी हमी देत गायकवाड यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कृषी विभाग, नगररचना, मूल्यनिर्धारण, पीएफ कार्यालय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील भरतीच्या जाहिराती पाठवून विविध परीक्षा केंद्रांवर अर्ज करण्यास सांगितले.
दरम्यान, मंत्रालयातील सचिवांशी चर्चा झाल्याचा दावा करत कृषी विभागातील गट ‘क’ पदासाठी १० लाख रुपये खर्च येणार असून त्यापैकी तीन लाख रुपये आगाऊ द्यावे लागतील, असे गायकवाड यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुरुवातीला त्यांनी रोख रक्कम मागितली. मात्र, रोख पैसे देणे शक्य नसल्याचे मोरे यांनी सांगितल्यानंतर संशयिताने आपल्या मुलगा साहील गायकवाड याचे बँक खाते दिले. त्यानुसार फिर्यादींचा मुलगा जयेश मोरे याने तीन लाख रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. तसेच ८ ऑगस्ट २०२३ रोजी भारत गायकवाड यांनी जळगाव येथे येऊन आणखी ५० हजार रुपये रोख घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या भरती परीक्षेनंतर निकाल लागूनही नोकरी न मिळाल्याने मोरे यांनी संशयितांकडे साडेतीन लाख रुपये परत मागितले. त्यावेळी “भरती प्रक्रियेची चौकशी सुरू आहे”, “ज्यांना पैसे दिले ते संपर्कात नाहीत”, अशी विविध कारणे देत वेळकाढूपणा करण्यात आल्याचा आरोप आहे. वारंवार तगादा लावल्यानंतर संशयिताने पैसे परत देण्यास नकार देत, “तुमच्याने जे होईल ते करा,” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
अखेर नामदेव मोरे यांनी २३ जून रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी भारत एकनाथ गायकवाड आणि साहील भारत गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.




















