जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।
राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद हि जळगाव जिल्ह्यात होत असते. त्याच तापमानाने यंदा चाळीशी ओलांडली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरुवारी करण्यात आली. तापमानाचा पारा ४१.७ अंश सेल्सिअसपर्यंत गेला असताना ढगाळ वातावरणामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला.
दुपारनंतर बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी आणखी तापमान वाढल्याची नोंद ‘आयएमडी’ने घेतली. सकाळी ११ पासून जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. दुपारी १२ वाजल्यानंतर उष्ण लहरींच्या झळा बसत गेल्या. दुपारी दोननंतर वातावरणात काहीसा बदल झाला. ढगाळ वातावरणासह वाऱ्याने हजेरी लावल्यानंतर काहीसा दिलासा मिळत गेला.
तीन दिवस पावसाचे !
आयएमडीच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील काही भागांत पाऊस होईल. त्यामुळे तापमानाचा पारा पुढील तीन ते चार दिवस ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर जाणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यातही ऊन-सावलीचा खेळ सुरू राहणार आहे.