
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून, विधान परिषदेच्या तब्बल १७ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील ९ विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता परिषद निवडणुकीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मतदारसंघांतील निवडणुकीचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या तरी परिषद निवडणुकीत त्याचा अडथळा येणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लवकरच अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुका सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागांसाठीही राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीची बाजू मजबूत मानली जात आहे. भाजपकडे १३१, शिवसेना (शिंदे गट) ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४० आमदार असून, सहयोगींसह महायुतीचे एकूण संख्याबळ २३४ वर पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस १६, राष्ट्रवादी (शरद पवार गट) १० आणि शिवसेना (ठाकरे गट) २० असे मिळून ४९ आमदार आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपला ५, शिवसेनेला २, राष्ट्रवादीला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, काही पक्षांकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.






















