जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत विशेष NIA न्यायालयाने गुरुवारी, ३१ जुलै २०२५ रोजी सर्व सात आरोपींना “पुराव्यांअभावी” निर्दोष मुक्त केले. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी 1000 पानांच्या निकालात तपास यंत्रणांमध्ये झालेल्या गंभीर त्रुटींवर स्पष्टपणे टिप्पणी केली. निकाल जाहीर होताच समीर कुलकर्णी न्यायालयात अश्रू अनावर होऊन भावनाविवश झाले, तर अन्य आरोपींनी “१७ वर्षांनी पुन्हा जन्म झाल्यासारखे वाटत आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात रात्री स्फोट झाला होता. रमजान महिन्यात नमाजासाठी जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हा स्फोट घडवण्यात आला होता. या भीषण घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
स्फोटस्थळी सापडलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर तपास सुरु झाला आणि ३० सप्टेंबर २००८ रोजी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रारंभी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS कडे होता. मात्र, नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे तो वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान अनेकांना अटक झाली, अनेक वर्षे न्यायालयीन कोठडीत राहावे लागले. काहींना जामीन मिळाला, तरीही आरोप कायम राहिले. अखेर, १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष जाहीर करून खटल्याचा शेवट केला. हा निकाल देशभर चर्चेचा विषय ठरला असून तपास प्रक्रियेवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.




















