
जळगाव मिरर | ८ मे २०२६
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १० वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जगराम आडे (वय ६०) याला अखेर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. घटनेनंतर दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या विशेष शोधमोहिमेत त्याला आलेगाव परिसरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या अटकेनंतर परिसरात काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असले तरी या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना कायम आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू होताच पोलिस प्रशासनाने आरोपीच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. सलग दोन दिवस घनदाट जंगल परिसरात पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली. वन विभागानेही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावत तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि आरोपीला जंगल परिसरातून जेरबंद करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाने संपूर्ण अकोला जिल्हा हादरला आहे. पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय आरोपीने चिमुकलीवर पाशवी अत्याचार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांपासून आरोपी वारंवार अत्याचार करत होता. मात्र आरोपीच्या धमक्या आणि भीतीमुळे पीडित मुलीने सुरुवातीला कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती.
अखेर आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर चिमुकलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. हा प्रकार समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
या प्रकरणात आमदार रोहित पवार आणि नितीन देशमुख यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेत प्रशासनावर दबाव वाढवला होता. आरोपीला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर आणि पोलिसांच्या सातत्यपूर्ण शोधमोहिमेमुळे अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
सध्या आरोपीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.





















