जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या 4 दिवसांत विधिमंडळात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी विरोधकांनी सभात्याग करत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कारही टाकला. विशेषतः या प्रकरणी झालेल्या गदारोळात काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्याची वेळही आली. वाळू, रेतीची वाहतूक वैध परवाना देऊन 24 तास करण्याचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केले.
ते म्हणाले, वाळूचे उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येते. या कालावधीत वैध परवाना असणाऱ्या वाहनांना वाळूची वाहतूक करता येते. वाळू व्यतिरिक्त इतर गौण खनिजांना 24 तास वाहतूक करता येते. काही शहरांत दिवसा वाहनांची रहदारी जास्त असल्यामुळे वाळूच्या वाहतुकीस बंदी असते. अनेक ठिकाणी विविध प्रकल्पांचे काम विहित मुदतीत करण्यासाठी वाळूची मागणी वाढली आहे. शिवाय सायंकाळी 6 नंतर वाळूच्या वाहतुकीवर निर्बंध असल्याने उपलब्ध वाहनांचा वाळू पुरवण्यासाठी योग्य वापर होत नाही.
तसेच परराज्यातून राज्यात येणाऱ्या वाळूस झिरो रॉयल्टी पास देऊन 24 तास वाहतूक करण्यास परवानगी आहे. तथापि, राज्यातील वाळूच्या वाहतुकीस सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंदी असल्यामुळे राज्यातील वाळूचा पुरेपुर वापर होत नाही. त्यामुळे सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उत्खनन करून ठेवलेली वाळू वैध वाहतूक परवाना देऊन, काही अटीशर्तींच्या अधीन राहून 24 वाहतूक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे ते म्हणाले.
वाळूसाठी वाहतूक परवाना ईटीपी तयार करण्यासाठी 24 तास सुविधा ही महाखनिजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी उत्खनन करून ठेवलेल्या वाळू रेती गटाचे जिओ फेन्सिंग करणे, सीसीटीव्ही बसवणे, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस डिव्हाईस बसवणे इत्यादी बाबी शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असेही बावनकुळे यावेळी सभागृहात बोलताना म्हणाले.




















