जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
गेल्या महिन्यापासून देशात उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत येत आहे. यातच आता अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचाही दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या दोघांना मेडिकल टेस्टसाठी नेताना हा प्रकार घडला. या हत्येनंतर उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील योगी सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न विचारलेत. ते म्हणाले, या हत्येला दहशतवादाचं नाव देणार नाही, तर काय मारेकऱ्यांना देशभक्त म्हणणार का, त्यांना हार घालणार का? असा सवाल त्यांनी केलाय. याचा उत्तर प्रदेश सरकारशी काही संबंध नाही, तर मग ते कट्टर कसे झाले, त्यांच्याकडं इतकी शस्त्रं कुठून आली? एकाचवेळी गोळ्या झाडल्या जात असून त्यांना कुठंही अडवण्यात आलं नाही. ते मूलतत्त्ववादी आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देत आहे, असा आरोपही ओवैसींनी केलाय.
गोळ्या घालून धार्मिक घोषणा कशाला देता. त्यांना दहशतवादी नाही तर काय देशभक्त म्हणणार का? त्यांना फुलांचा हार घालणार का? असा सवाल करत ते म्हणाले, ‘जे लोक टीव्ही स्टुडिओत बसून आनंदोत्सव साजरा करत होते, तुम्ही गिधाडं आहात. तिथं पडलेले मृतदेह खा. आज भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरी कोणाची असेल, हे तुम्ही विसरत आहात. उद्या हाच तांडव मानवतेवर होणार आहे. अशामुळं लोकशाही यशस्वी होणार आहे का, संविधान मजबूत होईल का? असंही ते म्हणाले.