जळगाव मिरर / २३ मार्च २०२३ ।
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत माहीमच्या खाडीत धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा दावा केला होता. तसेच, हे बांधकाम न हटवल्यास त्याशेजारीच गणपती मंदिर बांधणार, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सकाळीच हे अतिक्रमण हटवले आहे.
माहीमच्या खाडीतील अनधिकृत बांधकामावर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांनी काल हे बांधकाम पाडण्याची मागणी करताच काल रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पथकाचीही स्थापना करण्यात आली होती. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेवर आश्चर्य व्यक्त होत आहे.