
जळगाव मिरर | २१ जून २०२६

यावल तालुक्यातील कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यादरम्यान घडलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र यावल पोलिसांच्या सखोल तपासातून हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले असून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (वय २६) याला बुधवारी मध्यरात्रीनंतर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. अज्ञात याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सोळंके आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री एका शेतात पार्टीसाठी जमले होते. त्यानंतर काहीजण घरी परतले, तर पवन सोळंके हा उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी व लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्यासोबत किनगाव परिसरात गेला होता. तेथे झालेल्या वादातून पवनला मारहाण करण्यात आली. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निषान्न झाले.
संशयितांनी दाखवून दिलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने पंचनामा केला. या प्रकरणी उमेश परदेशी, चेतन कोळी आणि लोकेश महाजन यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व हवालदार वासुदेव मराठे यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली आणि प्रकरणातील सत्य समोर आले.




















