
जळगाव मिरर | ७ मे २०२६
अल निनोच्या प्रभावाला छेद देत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, मुंबईकरांना या पावसाचा आनंद लुटता येणार नसून पुढील काही दिवस दमट हवामान आणि उकाडाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याच्या डोंगराळ भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून, अल निनो आणि सुपर निनोचा प्रभाव आता ओसरत असल्याचे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता असली तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या किनारी जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पावसाऐवजी दमट आणि उकाड्याचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उष्म्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आणखी काही दिवस घामाच्या धारांचा सामना करावा लागू शकतो.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त माहितीनुसार, पुढील काही तासांत हिंगोली, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास राहू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः वादळी वाऱ्याच्या काळात झाडाखाली किंवा उघड्या मैदानात न थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





















