जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना भाजपमध्ये गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्गजांनी पक्ष प्रवेश करीत भाजपला समर्थन दर्शवित असतांना आता जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 4 लाख 11 हजार मताधिक्याने विजयी होऊनही जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने यंदा तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज उन्मेष यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धवसेनेत प्रवेश केला आहे.
दरम्यान उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे. तसेच सत्ताधारी भाजपच्या विद्यमान खासदाराने महाराष्ट्रात पक्षांतर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. उन्मेश पाटील हे आता ठाकरे गटाकडून जळगावातून लढणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची घोषणाही केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. उन्मेश पाटील हे जळगावातून विजयी झाल्यास शिवसेनेचा जळगावमधील हा पहिला विजय असेल. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे ठाकरे गट भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उन्मेश पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा पत्र दिले आहे. मेलच्या माध्यमातून उन्मेश पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने पत्र लिहून उन्मेश पाटील यांनी राजीनामा दिला. मी माझ्या जळगाव लोकसभा सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत असून तो स्वीकार करावा, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले