
जळगाव मिरर | २१ जून २०२६

चाळीसगाव शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील मांगरवाडी परिसरात दुकान लावण्याच्या वादातून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथील रहिवासी अक्षय भानुदास पाटील (२७) याचा विटांनी डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून निघृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भोला उर्फ निखिल सुनील अजबे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तपासाची चके वेगाने फिरवली.
तपासादरम्यान मुख्य आरोपी निखिल अजबे हा कन्नड घाट परिसरातून चाळीसगावकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक संदीप घुले यांच्या पथकाने कन्नड घाटाच्या पायथ्याशी सापळा रचून निखिल उर्फ भोला अजबे (२४, रा. लक्ष्मीनगर), प्रेम रविंद्र कसबे (२०, नारायणवाडी) आणि कन्हैया जितेंद्र देठे (२४, इंदिरानगर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत खून प्रकरणात प्रेम कसबे व कन्हैया देठे यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने तिघांनाही अटक करण्यात आली. शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.




















