जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२६
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनिल ओमप्रकाश मंधान (रा. गणपती नगर) या फळ व्यापाऱ्याच्या गाडीचा पाठलाग करून, गाडीतून ऑइल लीक होत असल्याचे खोटे सांगून त्यांच्या कारमधील तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणपती नगरात राहणारे अनिल ओमप्रकाश मंधान हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे मोठे व्यापारी आहेत. नेहमीप्रमाणे ते रात्री आपले दुकान बंद करून आपल्या (एमएच ४६ बीवाय ३२९५) क्रमांकाच्या कारने घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, आधीपासूनच त्यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या पाच संशयित चोरांनी पूर्वनियोजित कट रचून मंधान यांच्या गाडीचा मार्ग धरला.
अनिल मंधान हे गणपती नगर येथील आपल्या घराजवळ पोहोचत असतानाच, पाठीमागून आलेल्या त्या संशयितांनी त्यांना थांबवले. त्यांच्या गाडीतून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असून ऑइल लीक होत असल्याची बतावणी या चोरांनी केली. गाडीत बिघाड झाल्याच्या भीतीने आणि काळजीपोटी अनिल मंधान लगेचच गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी गाडीची पाहणी करण्यास सुरुवात केली.
मंधान हे गाडीच्या समोरील बाजूस किंवा बिघाड तपासण्यात व्यस्त असताना, याच संधीचा फायदा घेत त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरांनी अत्यंत चलाखीने कारच्या मागच्या सीटवर ठेवलेली १२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवली. काही वेळातच हा प्रकार अनिल मंधान यांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत संशयित आरोपी रोकड घेऊन तेथून पसार झाले होते.घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
घराजवळील तसेच परिसरातील रस्ते आणि दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्या घेतले असून, चोरटे कोणत्या वाहनाने आले होते आणि ते कोणत्या दिशेने पसार झाले, याचा शोध याद्वारे घेतला जात आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, फरार झालेल्या पाचही संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.



















