जळगाव मिरर | ११ नोव्हेबर २०२३ | राज्यातील जनतेला नेहमीच विविध योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार दिलासा देत असते. अशीच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील रेशनिंग दुकानातून सध्या फक्त अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. मात्र यापुढे शासनाकडून रेशनिंग दुकानावर अन्नधान्याबरोबरच साडीही मिळणार आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे.
शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी दरवर्षी या साडीचे वाटप होईल. सध्या ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. यासाठी वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रति कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेल्या एका साडीचे मोफत वाटप करण्यात येईल. राज्य यंत्रमाग महामंडळ या संस्थेमार्फत मोफत साडीची योजना राबवली जाणार असून महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ इतकी असून त्यांना याचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे.