जळगाव मिरर / ३ एप्रिल २०२३
आज समाजाला विषमतावादी व्यवस्थेने विळखा घातला आहे हा विळखा जर सोडवायचा असेल तर त्याकरिता बौद्ध साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेणे गरजेचे आहे. बौद्ध साहित्यिकांची जबाबदारी मोठी आहे. बौद्ध साहित्यिकांची भूमिका ही विश्वव्यापी आहे. बौद्ध साहित्य हे सर्वांना जवळ करणारे साहित्य आहे. प्रेमाच्या आणि कारुण्याच्या माध्यमातून माणसांना जोडणारे साहित्य आहे. मानवाचा कल्याणाचा विचार हाच बौद्ध साहित्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बौद्ध साहित्य निर्मितीकडे साहित्यिकांची वाटचाल झाली पाहिजे, असे प्रतिपादन तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर यांनी बबन कांबळे साहित्य नगरी डाॅ. आंबेडकर मार्केट येथे भरलेल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले. पुढे बोलताना डाॅ. यशवंत मनोहर म्हणाले की जाती आणि चातूवर्ण ही विषमतेचे किल्ले मजबूत करणारी हिंस्रसामग्री आहे. बौद्ध साहित्यिक आणि आंबेडकरवादी साहित्यिक या संज्ञा वेगवेगळे असले तरी त्यांचे मूल्यसंविधान एकच आहे. सर्वांना समान मानवाधिकार ही त्याची बैठक एकच आहे. विषमतेची निर्मीती कोणीतरी करीत असतात. विषमता आपसूक आकाशातून पडत नाही व जमिनीतून स्वतःहून उगवत नाही विषमता कोणीतरी निर्माण करीत असतात. वावर विषमताने कसले जाते. विषमतेचे निरंतर आणि विक्रमी पीक येईल याची काळजी कोणीतरी घेत असतात. विषमता ही नैसर्गिक घटना नसते. म्हणून ही विषमता नष्ट करण्यासाठी बौद्ध साहित्यिकांनी आपल्या लेखणीला वळण दिले पाहिजे आणि बौद्ध साहित्याच्या अनुषंगाने समतावादी विचार वाचकांपर्यंत पोचविले पाहिजे. बौद्ध साहित्यकांनी 85 टक्के बहुजन समाजाला एकत्रित करण्याची गरज आहे. बुद्ध म्हणजे धर्म नव्हे. कोणतेही कर्मकांड नव्हे. सर्वमय माणूसकीच्या ध्यासाला दुनिया बुद्ध म्हणते. बुद्ध हे समतेचे प्रतीक आहे. विषमतेपासून मुक्तीचे ते प्रतीक आहे. या समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी बौद्ध साहित्यिकांनी आता शिडे उभारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

संमेलनाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव .फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे माल्यार्पण करण्यात आले. उद्घाटक आनंद राजे आंबेडकर साहेब आपल्या भाषणात म्हणाले की आज बहुजन समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याचे काम व्यवस्था करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ठराविक वर्गाकरिता सीमित करण्याचे कार्य केले जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्व व्यापी असून घेतल्या प्रत्येक भारतीयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. त्यांनी दलित साहित्य आणि बौद्ध साहित्य मधला मूलभूत फरक उपस्थितांसमोर सविस्तरपणे मांडला. ‘दलित’ या संकल्पनेपासून आता आपण स्वतःची सुटका करून घेतली असून बौद्ध अस्मितेसाठी आपण आता साहित्याच्या माध्यमातून मोठी लढाई लढली पाहिजे, अशा पद्धतीचे विचार त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.
आपल्या स्वागत अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी या साहित्य संमेलनाची समाजाला नितांत गरज होती म्हणून आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी बहुजन समाज उपस्थित झाला आहे या संमेलनासाठी 45 सभा घेतल्या असून या सभांच्या माध्यमातून व्यापक प्रबोधन करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी साहित्य संमेलनाला मिळाली असल्याची माहिती त्यांनी सांगीतले. या तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बौद्ध साहित्याची चळवळ गतिमान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांना साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संमेलन अध्यक्ष डॉक्टर यशवंत मनोहर व उद्घाटक डॉ आनंदराजजी आंबेडकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. यावेळेस अजय भामरे संपादक असलेल्या लेखन मंच साप्ताहिकाचे बौद्ध साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. दलित शब्दाला आव्हान देऊन न्यायालयामार्फत दलित शब्दावर बंदी आणणाऱ्या अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज ललित मेश्राम यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान रॅलीला सुरुवात झाली. या संविधान रॅलीचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी केले शेकडोच्या संख्येने या रॅलीमध्ये बहुजन समाज संविधानाच्या संरक्षणार्थ रस्त्यावर उतरलेला होता. साहित्यिक जयसिंग वाघ आपल्या रॅलीला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले की भारतीय संविधानाच्या संरक्षण काळाची गरज आहे. त्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित राहिले एकत्रित आले पाहिजे. आज भारतात जातीयता व धर्मांधता मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी होत आहे, असे वारंवार सांगितले जाते. मात्र याला केवळ शासन जबाबदार नसून या देशातील साहित्यिक व विचारवंत सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. कारण साहित्यिक आणि विचारवंतावर समाजाची मोठी जबाबदारी असते, याचे भान आजच्या साहित्यिकांना राहिलेले दिसत नाही. साहित्यिक आणि विचारवंतांनी जर मनावर घेतलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्या संदर्भात होणारी गडचेपी तो थांबू शकतो.
आपल्या मनोगतामध्ये राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी व्यवस्था लोकशाही संपवण्याचे काम करत असल्याचे म्हटले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समृद्ध लोकशाहीला वाचवण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याकरिता संविधानाचे रक्षण सुद्धा केले गेले पाहिजे, असे आपल्या मनोगत त्यांनी मांडले. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले साहित्य संमेलन ऐतिहासिक होणार असल्याचा आशीवाद व्यक्त केला. प्रमुख मान्यवर डॉक्टर प्रदीप आगलावे आणि डाॅ. धनराज डाहट यांची प्रभावी भाषणे झाली. डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी खानदेशातील हे ऐतिहासिक साहित्य संमेलन असल्याचे सांगून या साहित्य संमेलनातून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात बौद्ध साहित्य संमेलन भरतील असा आशावाद व्यक्त केला.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राज्यातील तीन साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर माधवी खरात,पुणे, शिवदास म्हसदे, नाशिक, जगदीश घनगाव, ठाणे यांचा समावेश आहे. बुद्धिस्ट मुव्हमेंट सेंटर सणसवाडी मार्फत आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्राचे उद्घाटन डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्या हस्ते संपन्न झाले. विचार मंचावर स्वागत अध्यक्ष भरत शिरसाठ, मान्यवर डॉक्टर प्रदीप आगलावे, डॉक्टर धनराज डाहट, मनपा आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड, साहित्यिक जयसिंग वाघ प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर, बौद्ध साहित्य प्रसाद संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत सोनवणे, उपाध्यक्ष सुनील पवार उपाध्यक्ष विद्या भोरजारे, केंद्रीय सदस्य बि.आर. पंचांगे, कांतीलाल भडांगे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विधीज्ञ राजेश झाल्टे, कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सतीश मोरे, शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख धनराज मोतीराय, प्राध्यापक समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर संदीप कोतकर धम्मजागृती रॅलीचे प्रमुख चैतन्य नन्नवरे, संविधान सन्मान रॅलीचे प्रमुख सतीश गायकवाड, बौद्ध शिक्षक संघाचे प्रतिनिधी संजय निकम बी.टी. सपकाळे, कार्यवाह समितीचे प्रमुख डॉक्टर अशोक सैंदाणे, अर्थ समितीचे सहसचिव विवेक सैंदाणे, बौद्ध साहित्य परिषदेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष राजेंद्र पारे, बौद्ध साहित्य परिषद प्रदेश उपसमितीचे अध्यक्ष भटू जगदेव, कार्याध्यक्ष नवनाथ रणखांबे, महिला समन्वय समितीच्या प्रमुख संगीता ताई साळुंखे उपस्थित होते. बौद्ध शिक्षक संघाने या कार्यक्रमासाठी प्रचंड मोर्चे बांधणी केली होती. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये बौद्ध शिक्षक संघाचा मोठा वाटा असल्याचे संयोजकांनी सांगितले. याशिवाय संयोजन समितीचे सदस्य सुरेश सपकाळे, भालचंद्र बावस्कर, विवेक सैंदाणे युवराज वाघ, चैतन्य नन्नवरे, बी.बी. शिरसाट इत्यादींनी प्रचंड परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अशोक सैंदाणे व विनोद सपकाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार धनराज मोतीराय यांनी केले.




















