
जळगाव मिरर | 19 एप्रिल 2026
महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार होत असून, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून, 20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्यातील विविध भागांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांत दुपारनंतर आभाळ दाटून येऊन मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. पुणे विभाग, मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी या पावसाची तीव्रता आणि क्षेत्र काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, तसेच वादळी वारे आणि गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले आहे.
एकीकडे अवकाळी पावसाचा फटका आणि दुसरीकडे वाढते तापमान अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना, येत्या काही दिवसांत पुन्हा अवकाळीचा धोका निर्माण झाल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे प्रशासन आणि शेतकरी दोघांनाही पुढील काही दिवस सतर्क राहावे लागणार आहे.






















