जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
पूर्वीच्या काळी अनेक लोकांनी ग्रामीण भागातून शहरी भागात जात आपल्या व्यवसाय थाटला होता तर काहींनी नोकरी शहरी भागात केल्या पण सध्या अनेक शहरातून लोक ग्रामीण भागात राहावयास येत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे वाढती लोकसंख्या व महागाईच्या कारणाने अनेक ग्रामीण भागात स्थायिक होत असतांना दिसत आहे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घर बांधून राहण्याचं स्वप्न अनेकांनी पाहिलेलं असतं. नोकरी-व्यवसायातून बचत करून एखादं घर बांधणं किंवा घेणं शक्य होतं; मात्र आलिशान बंगल्याचं स्वप्न पूर्ण करणं अवघड असतं; पण आलिशान घरासोबतच सरकार 50 लाख रुपये देणार असल्याचं कळलं तर? खरोखरच स्वित्झर्लंड सरकारनं तशी ऑफर दिली आहे. अल्बीनेन नावाच्या गावात लोकांनी जाऊन राहावं असं आवाहन स्वित्झर्लंड सरकारनं केलं आहे. तशी ऑफर देण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे, हे जाणून घेऊ या.
स्वित्झर्लंडमधलं अल्बीनेन हे गाव समुद्रसपाटीपासून 4265 फूट उंचीवर वसलं आहे. बर्फाची चादर ओढलेलं हे सुंदर गाव पटकन कोणालाही आकर्षित करतं. तिथलं वातावरणही स्वच्छ आणि प्रदूषणरहित आहे. अशा सुंदर, निसर्गरम्य ठिकाणी कायमस्वरूपी राहावं असं सगळ्यांना वाटतं. अल्बीनेन गावातले नागरिक मात्र तिथे राहायला तयार नाहीत. डेली मेलच्या वृत्तानुसार, या गावाची लोकसंख्या सतत कमी होते आहे. 2020 या वर्षाअखेर या गावाची लोकसंख्या केवळ 243 इतकी उरली होती. गावातल्या लोकांना गाव सोडण्यापासून थांबवण्यासाठी व गावाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी स्वित्झर्लंड सरकारने आता नागरिकांना तिथं येऊन राहण्याची ऑफर दिली आहे. हे गाव फ्रान्स आणि इटलीच्या सीमेवर वसलेलं आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, तुमच्या घरात 4 सदस्य असतील, तर प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 22,500 पौंड म्हणजेच 22 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि प्रत्येक लहान मुलाला नऊ हजार पौंड म्हणजे 8 लाख रुपये दिले जातील. ही ऑफर स्वीकारणाऱ्यांचं वय 45पेक्षा कमी असावं. तसंच त्यांच्याकडे सी परमीट असावं आणि ते स्वित्झर्लंडचे नागरिकही असावेत. ही ऑफर स्वीकारायची असेल, तर या गावात कमीत कमी 10 वर्षं तरी राहावं लागेल. त्याआधी तुम्ही गाव सोडणार असाल, तर ऑफरपोटी मिळालेली रक्कम तुम्हाला परत करावी लागेल.
अल्बीनेन हे डोंगरदऱ्यांत वसलेलं गाव आहे. त्यामुळे तिथे रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत. लोकसंख्या कमी झाल्यानं तिथली शाळाही बंद झाली आहे. उरलेल्या 240 जणांमध्ये केवळ 7 मुलं आहेत. ही मुलं जवळच्या भागात रोज बसने प्रवास करून शिकायला जातात. गावातली अनेक घरं रिकामी आहेत. याच घरांमध्ये नागरिकांनी राहायला यावं अशी सरकारची ऑफर आहे. ज्यांना जमीन खरेदी करून घर बांधायची इच्छा आहे, त्यांना सरकार काही सवलतीही देणार आहे.