जळगाव मिरर | २५ जुलै २०२५
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने बस स्टँडवर थांबलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या घोळक्यात घुसून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव) या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, कुरुंकली भोगावती कॉलेजच्या रिक्वेस्ट बस स्टँडजवळ घडली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी विद्यार्थिनींवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून, मृत विद्यार्थिनीच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कारचालकासह दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सीपीआर रुग्णालयाबाहेर आणि अपघातस्थळी नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं असून, वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागले, ही खंत सर्वत्र व्यक्त होत आहे.




















