
जळगाव मिरर | ७ जून २०२६

वरणगावजवळील हिरा मारोती मंदिर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी स्कॉर्पिओ चालकाला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (एमएच १९ ईव्ही ५३५३) चालक सुधीर सुभाष पाटील (रा. उदळी, ता. रावेर) याच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकी (एमएच २२ बीडी ३६८१) वरून प्रवास करणारे विजय शंकर काळे, ऐश्वर्या बहादूर भोसले, विघ्नेश शंकर चव्हाण आणि मोनालिसा बहादूर भोसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आजारी असलेल्या मोनालिसा भोसले यांना उपचारासाठी वरणगाव येथे घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीवरील चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, मृत चौघांवर शुक्रवारी मध्यरात्री कपिल वस्ती नगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ईश्वर तायडे, साहेबराव कोळी आणि फिरोज पठाण करीत आहेत.




















