जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेच्या फी वाढीसंदर्भात पुनर्विचार करून यावर योग्य तो तोडगा लवकरात लवकर काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगरू व्ही एल माहेश्वरी यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत दिले.
क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या प्रवेश प्रक्रियेची फी वाढ केल्यामुळे अनेक आर्थिक दुर्बल व ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना, जळगाव तर्फे क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एल माहेश्वरी, प्र कुलगुरू एस टी इंगळे व रजिस्ट्रार के एल पवार रजिस्टर यांची भेट घेऊन विद्यापीठात चर्चा करण्यात आली यावेळी ते बोलत होते. सोबतच कुलगुरूंनी फी वाढीसंदर्भात विद्यापीठाची भूमिका देखील यावेळी समजावून सांगितली.
विद्यापीठाचे शुल्क परिपत्रक क्रमांक ३०/२०२२ यानुसार विद्यापीठाने दुपटीने केलेली फी वाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने १२ ऑगस्ट रोजी विद्यापीठात निवेदन सुपूर्द केले होते. मात्र त्यावेळी कुलगुरूंशी याबाबत चर्चा करता आली नव्हती. दरम्यान शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी विद्यापीठात कुलगुरू, प्र कुलगुरू तथा रजिस्ट्रार यांच्याशी चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यास संदर्भात विनंती करण्यात आली. सदर मागण्या अत्यंत संवेदनशील असताना विद्यापीठ प्रशासन याकडे डोळेझाक करत असून कुलगुरूंना निवेदन द्यायला गेल्यास ते निवेदन स्वीकारत नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती मात्र शनिवारी कुलगुरूंनी प्रत्यक्ष विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन पुढील नियोजन लवकरात लवकर ठरवण्यात येईल याबद्दल आश्वासन दिले यावेळी अविनाश तायडे, सुष्मिता भालेराव, अजय पाटील, नेहा पवार, वैशाली कोळी, चंचल धांडे, दिनेश राठोड हे उपस्थित होते.