
जळगाव मिरर | १४ जून २०२६

भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात जुन्या वादातून ४५ वर्षीय महिलेवर धारदार लोखंडी हुकने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १२) रात्री घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जळगाव येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता सुरेश पाटील (वय ४५) या यशवंत नगर परिसरात राहतात. त्यांचा परिसरातील असलम बिस्मिल्ला शेख व शमीन असलम शेख यांच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. या जुन्या वादाचे रूपांतर गुरुवारी रात्री हिंसक घटनेत झाले.

आरोपींनी कविता पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर असलम शेख याने त्यांना जबरदस्तीने घरात ओढून नेल्याचा आरोप आहे. तेथे हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार लोखंडी हुकने त्यांच्या गळ्यावर दोन ते तीन वार करण्यात आले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. दरम्यान, जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात असलम बिस्मिल्ला शेख व शमीन असलम शेख या दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत शोधमोहीम राबवली. यामध्ये आरोपी असलम बिस्मिल्ला शेख याला भडगाव परिसरातून तर शमीन असलम शेख हिला चाळीसगाव येथून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




















