अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तोरणमाळ फिरायला गेले असताना परत येतांना रस्त्यावरील खड्ड्यांनी अमळनेर तालुक्यातील वावडे येथील १९ वर्षीय भावी अभियंता तरुणीला जीव गमवावा लागल्याची घटना शहादा तालुक्यातील अनरदबारीजवळ दिनांक २९ रोजी सायंकाळी घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील वावडे येथील रवींद्र ठाकरे व कुटुंबीय तोरणमाळ फिरायला गेले होते. तेथून परत येत असताना येथून परततांना त्यांची मुलगी हर्षदा रवींद्र ठाकरे (वय १९) ही मावस भावासोबत स्कुटीवर येत होती. मात्र अनरदबारी जवळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात गाडी घसरल्याने गाडीवर बसलेली हर्षदा रस्त्यावर पडली व मागून येत असलेल्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली डोके आल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. ती शिरपूर येथील आर सी पाटील इंजिनियरिंग कॉलेज मध्ये द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील प्रगतशील शेतकरी असून तिच्या या अपघाती निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून खड्ड्यांमुळेच ह्या निष्पाप तरुणीचा जीव गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे स्थानिकांची ही ओरड आहे. अपघात प्रकरणी पोलिसांत नोंद झाली आहे.