
जळगाव मिरर | ४ मे २०२६
मुंबई शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सायन परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणावर धारदार कोयत्याने हल्ला करण्यात आला असून, कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकलेल्या अवस्थेतच तो स्वतः चालत सायन रुग्णालयात पोहोचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. या वादातूनच त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे कोयता थेट त्याच्या डोक्यात अडकला. गंभीर जखमी असूनही त्या तरुणाने धैर्य दाखवत स्वतःच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय गाठले.
रुग्णालयात पोहोचल्यावर त्या तरुणाची अवस्था पाहून उपस्थित डॉक्टर आणि कर्मचारी क्षणभर हादरले. व्हायरल व्हिडिओमध्ये तो शांतपणे उभा राहून उपचाराची प्रतीक्षा करताना दिसत आहे, ज्यामुळे या घटनेची गंभीरता अधिक स्पष्ट होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सायन परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘स्वप्ननगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळायला हवेत, अशी मागणी केली आहे. काहींनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, व्हिडिओमध्ये जखमी तरुण उपचारासाठी थांबलेला असताना त्याच्या आसपास वैद्यकीय कर्मचारी दिसत नसल्याची बाबही अनेकांच्या संतापाचा विषय ठरली आहे.
अशा अवस्थेत असलेल्या व्यक्तीला त्वरित मदत मिळायला हवी होती, किमान बसण्यासाठी तरी योग्य व्यवस्था असायला हवी होती, अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत. काहींनी तर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.




















