
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
राज्यातील अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक – सिन्नर महामार्गावर एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी घडली. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच बसने पेट घेतला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
या महामार्गावर शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या इथे बचावकार्य सुरू आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.




















