
जळगाव मिरर | २३ जून २०२३
राज्यात गेल्या काही दिवसापासून दूर गेलेला पाऊस आता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी आनंदी दिसू लागले आहे. राज्यात आजपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूरस मराठवाड्यातील नांदेड तथा मुंबई व आसपासच्या भागांत शुक्रवारी सकाळी रिमझिम पाऊस झाला. यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. तर उर्वरित राज्यात नागपूर, नांदेडमध्येही हलका पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी वातावरणात बदल होऊन ढग दाटून आल्याचे चित्र आहे.
8 जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर हवामान विभागाने 23 जून रोजी मान्सून परतणार असल्याचे सांगितले होते. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिके वाया गेली आहेत.





















