
जळगाव मिरर | 29 मार्च 2024
महिनाभराच्या मुक्कामावर धर्मनगरी जळगावात आलेले पद्मभूषण विभूषित पूज्य जैनाचार्य संत विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांनी गणपती नगरातील रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवनात तीन दिवसीय प्रवचनमालेच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्वांना संबोधित केले आणि समजावून सांगितले की, कोणाकडे कितीही पैसा असला तरीही, तसेच बंगला, गाडी, जमीन, संपत्ती सर्वकाही जरी असेल, पण कुटुंबात प्रेम नसेल तर एवढ्या संपत्तीचा उपयोग काय?
आज पैशाच्या हव्यासापोटी लोक नाती विसरतात आणि संबंध देखील तोडतात. पैसा किंवा संपत्तिचे प्रेम ज्यासाठी आपण हे सर्व करतो तो केवळ बाह्य देखाव्याचा, ग्लॅमरचा झगमगाट आहे. जे सुख तर देते पण आध्यात्मिक शांती आणि आनंद देऊ शकत नाही. आपल्या पूर्वजांचे उदाहरण देताना संतश्री यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्याकडे आजच्याइतका पैसा नव्हता, पण त्यावेळी त्यांच्यात परस्पर प्रेम आणि सौहार्द होता. नात्यांमध्ये ताकद होती. आज पैशाच्या प्रेमापोटी भावा-भावांमध्ये कुरबुरी सुरु आहे, वाईट घडत आहे, एकमेकांचे तोंडही त्यांना पाहायचे नाही. आपण हे समजून घेतले पाहिजे की, देव देखील प्रेमानेच प्रसन्न होतो आणि जेव्हा परस्पर प्रेम आणि सामंजस्य असते तेव्हाच आपल्याला भेटतो. मनुष्याने आज देव नाही तर आपल्या पूर्वजांकडे पाहून परस्पर कौटुंबिक आणि सामाजिक प्रेम वाढवले पाहिजे, हीच मानव जन्माची सर्वात मोठी संपत्ती असेल.
पूज्यपाद संतश्रींनी आपल्या उद्बोधनाद्वारे आवाहन करताना सांगितले की, प्रेमाचे शत्रुत्व म्हणजे थेट ईश्वराशी शत्रुत्व, म्हणून भगवंताशी मैत्री करण्यासाठी प्रेमाला आपला मित्र बनवावा लागेल. कोणत्याही धर्मावर प्रेम करु नका, प्रेमालाच धर्म बनवा. प्रवचन हे टाईमपास किंवा मनोरंजनाचे साधन नाही, प्रवचन हा चिंतनाचा आधार आहे. जितके जास्त आध्यात्मिक मंथन होईल तितकी त्याची विवेकबुद्धी शुद्ध होईल. हीच प्रेमाची आणि प्रवचनाची वैश्विकता आहे जी भगवान महावीरांनी आत्मसात केली आणि भगवंताचा अवतार प्राप्त केला. त्याचप्रमाणे, इतरांचे दु:ख पाहून देखावे करु नका, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा.
प्रवचन मालिकेच्या आज पहिल्या दिवशी पूज्यपाद संतश्री विजय रत्नसुंदरसूरीश्वर महाराज आणि त्यांच्यासोबत आगमन झालेल्या 75 साधू-साध्वींचे श्री सकल जैन संघाचे अजय ललवाणी यांनी शब्द सुमनांनी स्वागत केले आणि श्रवणाचा लाभ घेणार्या सर्व भाविकांना आपल्या सर्व समाजबांधवांसह या प्रवचन मालिकेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



















