जळगाव मिरर | ४ जुलै २०२६
जालना-वडीगोद्री महामार्गावरील शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या सुमारे २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह जवळपास ३० प्रवासी जखमी झाले, तर दोन्ही बसचालक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींवर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ‘मानव विकास मिशन’ची बस (एमएच-१४ एमएच-१७५०) भांबेरी येथून २५ ते ३० शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे जात होती. त्याचवेळी अंबडहून बीडकडे जाणारी एसटी बस (एमएच-१४ बीटी-३०२२) समोरून येत होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर पोहोचताच बीडकडे जाणाऱ्या बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात घुमल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या आणि घाबरलेल्या विद्यार्थ्यांना तसेच अन्य जखमी प्रवाशांना नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या एसटी बसमध्येही १२ ते १५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसला, तरी शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि त्वरित मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे.





















