
जळगाव मिरर | २१ मे २०२५
राज्यातील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल दि. २० मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखे ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यामुळे राष्ट्रवादी पक्षांतर्ग नाराजी पसरली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अनेक आमदारांनी दांडी मारली होते. वारंवार भुजबळांनाच संधी दिली जात असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकारमध्ये डावलण्यात आलेले माजी मंत्री आणि मंत्रीपदाची अपेक्षा बाळगून असलेले आमदार देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र, फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आलं आहे. त्यांच्या ऐवजी भाजपच्या संजय सावकारे यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील दूरावा पाहाता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं मंत्रिपद अनिल पाटील यांच्याकडे जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर दौऱ्यावर असताना अनिल पाटील यांचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो, असे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात छगन भुजबळ यांनीच मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे अनिल पाटील यांची संधी हुकली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच नाराजीचा सूर जोर धरू लागला असल्याचे चित्र आहे.





















