
जळगाव मिरर | ३ जून २०२५
राज्यातील भाजप व ठाकरे गटाचे नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले असा आरोप केला. राऊतांनी ठाकरेंची शिवसेना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवली. त्यात जी दलाली तुम्ही केली तेवढी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
एवढंच नाहीतर संजय राऊत जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरजच नाही. कारण तेच पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. राऊतसारख्या दलालांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आहेत असे गिरीश महाजन म्हणाले. तसेच संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती म्हणूनच त्यांनी शिवसेनेला कॉंग्रेस व शरद पवार यांच्या दावणीला बांधलं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे सगळे विचार संपवले. राऊतांची बडबड बंद झाली नाही तर शिवसेना शिल्लकच राहणार नाही, उद्धवजींचं देवच भलं करो असं महाजन म्हणाले.




















