
जळगाव मिरर | ८ जून २०२५
यावल – आपल्याला सामाजिक समतेचे, बंधुत्वाचे आणि समजूतदारपणाचे मूल्ये टिकवायचे असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शच आपला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे शिवराज्याभिषेक हे केवळ एका राजाचे राज्यारोहण नव्हते, तर समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधणारा सामाजिक समरसतेचा महायज्ञ होता, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
न्हावी- फैजपूर येथील जे. टी. महाजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्य कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार 6 जून शुक्रवार रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जगदीश पाटील यांनी सामाजिक समरसता या विषयावर संवाद साधला. प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवराज्याभिषेकदिनी आयटीआय मधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे अप्पर सचिव मनीषा वर्मा यांनी ऑनलाईन दिलेले व्हिडीओ दाखवण्यात आले. यावेळी प्राचार्य पी. के. फालक, जळगाव दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, प्रेमचंद फेगडे भुसावळ, पी. के. चौधरी, के. एन. भिरूड, एस. डी. झोपे, टी. बी. बोरोले, एम. डी. महाजन, पी. व्ही. झोपे, महेश चौधरी, राजू चौधरी, हेमंत ओगले व आयटीआयमधील विविध ट्रेडचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. एस. भिरूड यांनी तर आभार प्राचार्य पी. के. फालक यांनी मानले.
सामाजिक समरसता या विषयावर संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदृष्टीचे, न्यायप्रिय आणि सर्वसमावेशक राजे आहेत, ज्यांनी हिंदवी स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर समानतेच्या मूल्यांवर उभारले. त्यांनी प्रतिभा, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्वाच्या आधारावरच अधिकार दिला. जातपात, धर्म, वर्ग या पलीकडे जाऊन मानवतेला महत्व देणे हेच खरे स्वराज्य!, हे तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या राज्यकारभारात सामाजिक समरसता ही नैतिक मूल्ये आणि न्यायाची शिस्त होती. आजच्या काळातही त्यांचे हे धोरण आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरते, असेही ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणे. एकजुटीने आणि समतेच्या भावनेने जगणे, हीच सामाजिक समरसतेची खरी ओळख आहे. आज सामाजिक समरसता घडवण्यासाठी आपल्याला शब्दांपेक्षा कृतीवर भर द्यावा लागेल. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपणही एक समरस समाज घडवू शकतो, असा विश्वास देखील डॉ. जगदीश पाटील यांनी व्यक्त केला.