
जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२६
अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी एफआयआर नोंदवला जात नसल्यामुळे सरकारवर संशय निर्माण होत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केला. “सरकार एका एफआयआरला का घाबरत आहे? जर हा निव्वळ अपघात असेल तर गुन्हा नोंदवण्यास अडथळा का?” असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती दिली. त्यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला; मात्र तिन्ही ठिकाणी तो नोंदवला गेला नाही. “मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर टाईप केला जात असतानाच वरिष्ठ अधिकारी येऊन तो थांबवतात, हे नेमके कशासाठी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“जर कुटुंबीयांना अपघाताबाबत संशय असेल आणि तपास पारदर्शक व्हावा अशी अपेक्षा असेल, तर एफआयआर दाखल होणे आवश्यक आहे. मात्र सरकारकडून अडथळे आणले जात असतील, तर निश्चितच संशयाची सुई तिकडेच वळते,” असे ते म्हणाले. पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे का, याचाही शोध घेतला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. “त्या सध्या सत्तेत आहेत. त्यांच्या पतीच्या अपघाताविषयी एफआयआर नोंदवण्यास अडथळे येत असतील, तर त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे,” असे ते म्हणाले.
अजित पवार यांच्या अपघातानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी एफआयआर नोंदवण्याबाबत निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सरकारकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, येत्या काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















