
जळगाव मिरर | १२ मे २०२६
चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथे उष्णतेमुळे अस्वस्थ झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास घडली. चेतन कृष्णा पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बोरखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन पाटील हा रविवारी दुपारच्या वेळी अचानक अस्वस्थ झाला. प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांनी तातडीने त्याला गावातील खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. अशातच तरुणाच्या मृत्यूच्या घटनेने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेतन हा कृष्णा हिंमत पाटील यांचा मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिणी असा परिवार आहे. परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत चेतनला श्रद्धांजली अर्पण केली.





















