जळगाव मिरर | १० जुलै २०२६
शहरातील शिवधाम मंदिर परिसरातील चंदुआण्णा नगर येथे पत्नी बाथरुममध्ये असतांना प्रसाद नारायण देशमुख (वय ३०) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. ८ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवधाम मंदिर परिसरातील चंदुआण्णा नगरात प्रसाद देशमुख हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. दि. ८ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास प्रसादची पत्नी बाथरुमला गेलेली असतांना त्याने घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर प्रसादची पत्नी परत रूममध्ये आली असता तिला प्रसाद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रसादला पाहून पत्नीने हंबरडा फोडीत एकच आक्रोश करून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सासू-सार्सयांना उठविले. कुटुंबीयांनी तत्काळ प्रसादला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
प्रसादने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रसादच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे चिमुकल्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




















