जळगाव मिरर | १० जुलै २०२६
शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय अतुल अशोक धनगर या तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात अतुल धनगर हा तरुण वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अतुल धनगर हे घरुन थेट शिकॉलनी रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेल्या रेल्वे रुळावर पोहचले. त्याठिकाणी समोरुन येत असलेल्या धावत्या रेल्वेखाली त्याने स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अतुलच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.
दोन वर्षांपूर्वीच अतुलच्या पत्नीचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुण मुलाच्या अशा अचानक जाण्याने वृद्ध आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अतुलच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अखेर पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत मृतदेह रुग्णवाहिकेत टाकला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवला. या घटनेनंतर शिव कॉलनी उड्डाणपुल व पिंप्राळा रस्त्यालगत बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.




















