जळगाव मिरर | १५ जून २०२५
अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा पाण्याची पंप सुरू करताना विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (वय २८) हा तरुण १३ रोजी ४.३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी वीज पंप सुरु करण्यासाठी गेला होता. मात्र, पंप सुरू करताच सचिनला विजेचा जबर झटका लागून तो फेकला गेला. याचवेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सचिन हा जमिनीवर पडलेला होता, तर त्याच्या डाव्या हातात पंपाची वायर होती. दरम्यान, नागरिकांनी विजेचा प्रवाह बंद करुन सचिनला खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन सचिनला मृत घोषित केले. मयत सचिन पाटील हा कृषी उत्पादनांच्या मार्केटिंगचे काम करायचा. तर त्याचे आई व वडील शेती करतात. कर्ता तरुण मुलगा गमावल्याने त्यांनी मोठा आक्रोश केला होता.
यावेळी उपस्थितांचे डोळे ही पाणावले होते. दरम्यान, मनमोकळ्या स्वभावाच्या सचिन पाटीलच्या अकाली मृत्युमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी साहेबराव निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुनील पाटील करत आहेत.




















