जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३
रेल्वे मार्गावर अपघाताच्या बिघाडाच्या घटना घडत असतानाच सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी नगर- आष्टी रेल्वेच्या ५ डब्यांना वाळुंज (ता. नगर) जवळ दुपारी ३ च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब तत्काळ लक्षात येताच रेल्वेतून प्रवासी उतरवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आग सुरुवातील दोन डब्यांना लागली असतानाच अवघ्या काही मिनिटांतच ही आग ५ डब्यांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, ४.१० वाजण्याच्या दरम्यान आग विझवण्यात यश आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर आणि आष्टी या मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०१४०२ नियमितपणे धावत असताना सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास अचानक या गाडीतील दोन डब्यांनी पेट घेतला. ही घटना मोटरमन आणि इतर प्रवाशांच्या लक्षात येताच तत्काळ ट्रेनमधील प्रवाशांना रेल्वे थांबवून उतरवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी हालचाली करण्यात आल्या.
आगीचे प्रमाण अधिक असल्याने तब्बल ४ अग्निशमन दलाच्या गाड्या टप्प्याटप्याने घटनास्थळी दाखल झाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप समोर आलेले नाही. आग कशामुळे लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत असून योग्य ती कारवाई संबंधित विभाग अथवा अधिकाऱ्यांवर केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, या घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.