जळगाव मिरर | १६ नोव्हेबर २०२३
देशभर काल भाऊबीजेचा उत्साह सुरु असतांना राज्यातील महामार्गावर अपघाताची घटना सातत्याने घडत आहे. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील वडनेर गावाजवळ घडली. यात जळगाव जिल्ह्यातील दोन तरुण असल्याचे देखील कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, वडनेर गावाजवळ दि.१५ नोव्हेबर बुधवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर तीन तरुण दुचाकीवरून जात असतांना त्याचवेळी मलकापूर येथून नांदुराकडे प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने निघाली होती. ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात जळगाव जिल्ह्यातील स्वप्निल करणकार (वय २७) गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्ष) तर कल्याण येथील आकाश राजू आखाडे अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन भाऊबीजीच्या दिवशी ३ तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.