
जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२४
देशातील लोकसभेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी लाखो भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठी बातमी दिली. येत्या काही महिन्यांत रेल्वे गाड्यांसाठी 2500 जनरल डबे बनवण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच ते तयार होतील असे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या कमी केल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याची माहिती आहे.
आता येत्या काही दिवसांत रेल्वे गाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या वाढवणार आहे. प्रत्येक मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये चार जनरल डबे बसवण्यात येणार आहेत. गाड्यांमधील गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ट्रेनमधील जनरल डब्यांचे प्रमाण स्लीपर आणि विना आरक्षित असे दोन तृतीयांश असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. एक तृतीयांश एसी डबे आहेत. हे मानक आहे आणि ते कायम ठेवण्यात आले आहे. तथापि, जनरल डब्यांची मागणी वाढत असल्याने, आम्ही 2,500 जनरल डबे बनविण्याचे काम सुरू केले आहे, येत्या काही महिन्यांत ते तयार होतील अशी माहिती त्यांनी संसदेत दिली.
मानकांनुसार प्रत्येक मेल ट्रेनला किमान चार जनरल डबे असावेत अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली, हे मानक सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये लागू केले जाईल. याशिवाय, वेटिंग लिस्ट आणि शॉर्टेज या समस्यांवर मात करण्यासाठी भविष्यात भारतीय रेल्वे दहा हजार जनरल डब्यांच्या निर्मितीचे काम सुरू करणार असल्याचेही त्यांनी संसदेत सांगितले.
अश्विनी वैष्णव यांनी सुमारे 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून भाषणाला सुरुवात केली. हे कर्मचारी दररोज सुमारे 20,000 गाड्यांचे सुरळीत संचालन सुनिश्चित करतात. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे ही देशाची जीवनरेखा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार वाहणारी महत्त्वाची संस्था असल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षेवर संसदेला संबोधित करताना, रेल्वेमंत्र्यांनी गेल्या दशकात या संदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. 26,52,000 पेक्षा जास्त अल्ट्रासोनिक फ्लॉ डिटेक्शन चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि सुरक्षा उपाय वाढविण्यासाठी अनेक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.






















