जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२५
राज्यातील महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून राजकीय तापलेले वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असा ठाम दावा करत खळबळ उडवली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सात आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायलाच हवे असे प्रत्युत्तर देत हक्क सांगितला आहे. या रस्सीखेचमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून चर्चा सुरू आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या नावाची नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी घोषणा केली होती. मात्र, तीव्र विरोधामुळे अवघ्या एका दिवसात ही नियुक्ती रद्द करण्यात आली. तरीही, धुळ्यातील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात महाजन यांनी पुन्हा एकदा “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार” असे सणसणीत विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. “मी दरवर्षी नाशिकला जातो आणि आता तिथे पालकमंत्री म्हणून काम करणार,” असे महाजन म्हणाले.
१६ ऑगस्ट रोजी राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. धुळ्यातील एका दहीहंडी कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी पावसाळी वातावरणातही तरुणाईच्या उत्साहाचे कौतुक करताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा दावा ठोकला. पाऊस सुरू असतानाही दहीहंडीचा उत्साह कायम आहे. मी दरवर्षी धुळ्यात येतो आणि नाशिकलाही जातो. आता नाशिकचा पालकमंत्री म्हणून काम करणार, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
गिरीश महाजनांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आणखी बळकट केला. “नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या, पण ज्या पक्षाचे सात आमदार आहेत, त्यांना हे पद मिळायलाच हवे,” असे भुजबळांनी ठणकावून सांगितले. “रायगडमध्ये एकच आमदार असताना आम्ही पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो, मग नाशिकमध्ये सात आमदार असताना आम्ही का मागे राहू? अजितदादा आणि सुनील तटकरे यांच्याशी मी याबाबत बोलेन. सात आमदारांचा दम आहे, शक्ती लावू,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.




















