चाळीसगाव : कल्पेश महाले
राज्यात मराठा आंदोलनावरून वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदत 24 ऑक्टोबरला संपलेली आहे. परंतु याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याने मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा आमरण उपोषणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांनी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील आडगावातही असे बॅनर लावण्यात आलेले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी आडगाव येथील मराठा समाजबांधवांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की, कोणाच्या तरी सांगण्यावरून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढ्या मध्ये कुठेही गालबोट न लागू देता हा लढा शांततेत दिला पाहिजे. तसेच कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारकडून मराठा आरक्षण मिळवूनच राहू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाबाबत दिलीप पाटील यांनी आज जळगाव मिरर न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, शिरसगाव येथे सकल मराठा समाजातर्फे 25 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास (28 ऑक्टोबर) चौथ्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसणार असण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य केली पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली आहे.