जळगाव मिरर | २३ मे २०२५
स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे उषाबाई गुलाब मोरे (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) या महिला गंभीररित्या भाजल्या गेल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना गरुवारी पहाटेच्या सुमारास दुर्देवी मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत उषाबाई मोरे या महिला आपला मुलगा सोनू आणि सुन यांच्या सोबत रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होत्या. महिनाभरापुर्वी उषाबाई मोरे ह्या गॅसवर स्वयंपाक करत असतांना त्यांच्या नळीतून अचानक गॅसची गळती झाली. त्याचवेळी आग लागल्याने उषाबाई मोरे या गंभीररित्या भाजल्या गेल्या होत्या. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांवर उपचारांना यश आले नाही. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.




















