
जळगाव मिरर | ५ जून २०२६

जळगाव शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या ‘ग्रीन कॉरिडोर’ (हरितपट्टा) प्रकल्पाची यशस्वी निर्मिती करण्यात आली असून, गुरुवार, ४ जून रोजी या प्रकल्पाचे मान्यवर लोकनेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले. याच उद्घाटनासोबत शहरात या हरितपट्ट्याची अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (अहमदाबाद), ‘प्रॅक्टिकल ॲक्शन’, जळगाव शहर महानगरपालिका आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (मलकापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने व उत्कृष्ट समन्वयाने या प्रकल्पाची प्रत्यक्ष निर्मिती करण्यात आली आहे. शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या योजनेसाठी ‘टाटा ट्रस्ट’ यांच्याकडून भरीव आर्थिक सहाय्य लाभले आहे. जळगाव महानगरपालिकेने आखून दिलेल्या रस्ते नियोजनानुसार चंदू अण्णा चौक ते कचरा फॅक्टरी आणि निमखेडी गाव ते सुरत रेल्वे गेट या ४ किलोमीटरच्या मार्गावर हा हरितपट्टा साकारण्यात आला आहे.
मंत्री आणि लोकनेत्यांच्या उपस्थितीत शुभारंभ व विकासावर चर्चा:

चंदू अण्णा चौक, निमखेडी शिवार येथे लोकनेते आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कृषी विकास संस्थेचे अधिकारी श्री. अमित नाफडे यांनी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांना या ‘ग्रीन कॉरिडोर’ योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांमध्ये जळगाव शहराचा लवकरात लवकर आणि शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली.
ना. गिरीश महाजन यांचा जनतेला पर्यावरणाचा संदेश:
या उद्घाटन प्रसंगी ना. गिरीशभाऊ महाजन यांनी उपस्थित नागरिक व संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला महत्त्वपूर्ण संदेश दिला. ते म्हणाले, “वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल पाहता निसर्गाचे रक्षण करणे ही काळाची सर्वांत मोठी गरज आहे. जळगावसह महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावण्याचा व ती जगवण्याचा संकल्प करावा. आज आपण निर्माण केलेला हा हरितपट्टा भविष्यातील पिढ्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरेल.”
यावेळी खासदार सौ. स्मिताताई वाघ, आमदार श्री. राजूमामा भोळे, महापौर सौ. दीपमालाताई काळे, उपमहापौर श्री. मनोजभाऊ चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापती सौ. सिंधुताई कोल्हे, नगरसेविका सौ. जयश्रीताई पाटील, सौ. प्रतिभाताई देशमुख आणि अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिहिर भाई भट उपस्थित होते.
संयोजकांचे विशेष कौतुक:
या भव्य प्रकल्पाच्या प्रत्यक्ष निर्मितीसाठी आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी कृषी विकास संस्थेचे अधिकारी श्री. अमित नाफडे, तसेच अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन, जळगाव येथील कर्मचारी अमोल काळे, धीरज अंबिकार, शुभम शीरतुरे, रेखा वाघमारे आणि स्वप्निल पडसकर यांनी घेतलेली मेहनत विशेष कारणीभूत ठरली. या सर्व टीमच्या कामाचे उपस्थित मान्यवरांनी तसेच स्थानिक नागरिकांनी भरभरून कौतुक केले.




















