अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जुनी पेन्शन मिळण्यासाठी तालुका समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.
सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात होते. प्रत्येकाने डोक्यावर एकच मिशन जुनी पेन्शन’ लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या. मंगलमूर्ती चौक, न्यायालय, महाराणा प्रताप चौक, बळीराजा चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा आला. त्याठिकाणी सभेत रूपांतर झाले. सभेत उपशिक्षणाधिकारी पवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कोणत्याही कारवाईला न घाबरता संपावर ठाम रहा. न्याय द्यावाच लागेल. राज्याच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
महाराष्ट्राच्या विकासात कर्मचाऱ्यांचे श्रम कामी आले आहेत. त्यांना पेन्शन दिलीच पाहिजे, असे संघटनेचे प्रा. भलकार, जुनी पेन्शन होता. संघटनेचे कुणाल पवार, पाकिजा पिंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील तर आभार टीडीएफचे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे यांनी मानले. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, गोपनीय अंमलदार शरद पाटील, सिद्धांत शिसोदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
या संघटनांचा सहभाग
मोर्चात नगरपालिका कर्मचारी संघटना, सफाई कर्मचारी संघटना, आरोग्य संघटना, ग्रामसेवक संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महसूल कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल संघटना, वैद्यकीय संघटना, भूमी अभिलेख, महिला बालकल्याण विभाग, लिपिक संघटनांचे अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले होते.