जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असून नुकतेच सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विजेचा शॉक लागून तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यात प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (35), पासरनाथ वनमोरे (40) आणि शाहीराज पासरनाथ वनमोरे (12) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (15) या युवकावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. सकाळच्या वेळी शेतात पाणी सोडण्यासाठी पासरनाथ वनमोरे गेले होते. त्यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती. शेतात चालत असताना पासरनाथ वनमोरे यांना जोराचा शॉक बसला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांना शोधण्यासाठी मुलगा शाहीराज वनमोरे शेतात आला असता त्यालाही विजेचा जोरदार शॉक बसला, यात त्याचाही मृत्यू झाला. यानंतर प्रदीप वनमोरे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागला व यात त्यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली वनमोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.