जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४
राज्यातील मोठ्या शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेदिवस वाढत असताना नुकतेच पुण्यामध्ये तीन उच्चशिक्षीत तरूणांना अटक करण्यात आली आहे. ते गांजा विक्री करत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी त्यांच्याकडून २७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यातील दोन तरूण खान्देशातील धुळे येथील असल्याची माहिती मिळतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजजवळ आंबेगाव बुद्रूक परिसरात ही घटना घडली आहे. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या स्थापत्य अभियंत्यासह तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणांकडून २७ किलो गांजासह तीन मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. हरीओम संजय सिंग, करण युवराज बागूल (दोघेही धुळे येथील रहिवासी) आणि वसंत सुभाष क्षीरसागर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागूल स्थापत्य अभियंता आहे. वसंत क्षीरसागरचे शिक्षण बीबीएपर्यंत झाले आहे, तर हरीओम सिंग हा इलेक्ट्रिशियन आहे. कात्रज येथील भारती विद्यापीठाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पाळत ठेवत कारवाई केली. त्यानुसार पोलिसांनी सिंग आणि बागूल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान, हे दोघे त्यांचा पुण्यातील साथीदार क्षीरसागर याच्याकडे गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आंबेगाव परिसरातून क्षीरसागरला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून सुमारे साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.





















